'माधुरी' हत्तीण नांदणी मठात परतली, उच्चाधिकार समितीनं परवानगी देताना कोणत्या अटी घातल्या?

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, उच्चाधिकार समितीनं परवानगी देताना कोणत्या अटी घातल्या?

फोटो स्रोत, @rajushetti

फोटो कॅप्शन, राजू शेट्टी यांनी माधुरी परतल्याचा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला आहे.
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

कोल्हापुरातील नांदणी येथील माधुरी हत्तीण अखेर शुक्रवारी रात्री परतली आहे. याठिकाणी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी ढोल ताशाच्या गजरात लाडक्या माधुरीचं स्वागत केलं आहे.

उच्चाधिकार समितीच्या (HPC) निर्देशांचे पालन करत माधुरीला 30 जुलै 2025 रोजी जामनगर येथील वनतारा केंद्रात नेण्यात आलं होतं. त्याला नंतर मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली होती.

त्यानंतर माधुरीला परत आणण्यासाठी मोठी लढाई विविध पातळ्यांवर लढण्यात आली. सरकारकडेही यासाठी मागणी करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पक्षांना आपापले म्हणणे उच्चाधिकार समितीसमोर मांडण्याचे निर्देश दिले होते. ती प्रक्रिया एवढे दिवस सुरू होती.

अखेर सर्व पक्षांचे म्हणणे ऐकून, अहवाल मागवून तसेच नांदणी येथील सुविधेची पाहणी केल्यानंतर उच्चाधिकार समितीनं 9 सप्टेंबर 2026 रोजी याबाबत सविस्तर आदेश दिला होता. त्यानुसार, काही कठोर अटींसह माधुरीला कोल्हापुरात परतण्यास परवानगी देण्यात आली.

अटींनुसार माधुरीचा मिरवणुका किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी वापर करता येणार नाही. चोवीस तास तिची काळजी घेणे बंधनकारक असून, दर पंधरवड्याला तिची वैद्यकीय तपासणी करावी लागणार आहे.

दरम्यान, सातत्यपूर्ण पशुवैद्यकीय उपचारांमुळे माधुरीची प्रकृती स्थिर झाली आहे. मात्र, तिच्या दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या कायम असून, त्यासाठी योग्य उपचार, सहाय्यक व्यवस्थापन आणि नियमित पशुवैद्यकीय देखरेख आवश्यक असल्याचं वनतारानं म्हटलं आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार माधुरी कोल्हापुरात परतल्यानंतरही तिच्या आरोग्याची जबाबदारी पार पाडणार असल्याचं वनतारानं म्हटलं आहे.

तसंच तिच्यासाठी योग्य निवास व्यवस्था, पशुवैद्यकीय सुविधा, वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि इतर साहित्यही वनताराकडून उपलब्ध करून दिलं जात आहे.

गोष्ट 'महादेवी'ची

ही गोष्ट आहे शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावाची आणि या गावच्या 'महादेवी' हत्तीणीची. तिला काही जण 'माधुरी'ही म्हणायचे. 1992 सालापासून ती या गावातल्या जैन समाजाच्या मठात वास्तव्याला होती.

पण, एक मोठ्या वादानंतर आणि न्यायालयीन संघर्षानंतर या 'महादेवी' हत्तीणीला 33 वर्षांपासूनचं घर सोडावं लागलं आणि गुजरातच्या दिशेला प्रयाण करावं लागलं होतं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

वन्यप्राण्यांसाठी असलेली विशेषाधिकार समिती, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुनावणी होऊन 28 जुलैला सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निकाल आला.

त्यानुसार या हत्तीणीला गुजरातच्या जामनगर इथं असलेल्या अंबानींच्या 'रिलायन्स फाऊंडेशन' च्या 'वनतारा' या संगोपन केंद्रात जावं लागलं.

कोल्हापूरच्या नांदणीतून लगेचच वनविभाग आणि 'वनतारा'च्या कर्मचाऱ्यांनी जामनगरला नेऊन 'वनतारा'चाच भाग असणाऱ्या 'राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट'च्या अखत्यारित दिलं.

या गावानं त्यांच्या घरातल्यांपैकीच एक असणाऱ्या या हत्तीणीला गावातच राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न करायचे सोडले नाहीत.

कधी रस्त्यांवर येऊन आंदोलनं केली, कधी सरकारी यंत्रणेशी दोन हात केले आणि शेवटी तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले. पण 33 वर्षांच्या या नात्यात अखेर दुरावा आला.

कायद्याची लढाई आणि 'वनतारा'ची एन्ट्री

'महादेवी' ऊर्फ 'माधुरी'ही हत्तीण नांदणीच्या मठात असतांना तिच्या गुजरातला नेण्याचा संघर्ष 2020 च्या आसपास सुरु झाला.

वन्य प्राण्यांच्या देखभालीसाठी आणि हक्कांसाठी काम करणा-या 'पेटा' (People for the Ethical Treatment of Animals) या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी या हत्तीणीची मठात योग्य देखभाल होत नसल्याची तक्रार वन्यप्राण्यांच्या देखभाल आणि हस्तांतरणासाठी असलेल्या दिल्ली येथील 'उच्चाधिकार समिती'कडे केली.

रिलायन्स फाउंडेशनने जारी केलेल्या व्हीडिओतलं दृश्य

फोटो स्रोत, VIDEO GRAB

फोटो कॅप्शन, रिलायन्स फाउंडेशनने जारी केलेल्या व्हीडिओतलं दृश्य
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मठाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्याप्रमाणे, "डिसेंबर 2023 मध्ये या उच्चाधिकार समितीनं या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्राच्या मुख्य वन्यजीव संरक्षक यांना ही हत्तीण गुजरातला 'वनतारा'चाच भाग असणाऱ्या 'राधे कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट' कडे हस्तांतरित करण्याविषयी सुचवलं."

एप्रिल 2024 मध्ये नांदणीच्या मठानं उच्चाधिकार समितीच्या आदेशाविरोधाअत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांची याचिका दाखल करुन घेत न्यायालयानं या हत्तीणीला गुजरातला हलवण्याला स्थगिती दिली.

त्यानंतर उच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार मोठा काळ तज्ज्ञ समिती, पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या तपासण्या, पाहणी सुरू राहिली. मठाचा दावा आहे की, या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालात या हत्तीणीची तब्येत सुधारत असल्याचे आणि 'हेल्थ सर्टिफिकेट' वेळोवेळी समिती आणि न्यायालयासमोर दाखल केली.

मात्र, 16 जुलैला उच्च न्यायालयाच्या नांदणीच्या मठाच्या ट्रस्टची ही याचिका निकाली काढत 3 जून 2025 रोजी उच्चाधिकार समितीनं ही हत्तीण गुजरातला नेण्याच्या निर्णय कायम ठेवला.

त्यानुसार 'महादेवी'ला 'वनतारा'चा भाग असलेल्या 'राधेकृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्ट' कडे हस्तांतरित करण्याचा आदेशही दिला.

'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठा'च्या ट्रस्टनं या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण तिथंही त्यांच्या हाती यश आलं नाही.

28 जुलैला सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला. त्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये 'महादेवी' हत्तीणीला गुजरातला अंबानींच्या 'वनतारा'त नेण्यात आलं.

'महादेवी' ऊर्फ 'माधुरी'चं नांदणीशी असलेलं नातं

शिरोळ तालुक्यातल्या नांदणी गावात अनेक शतकांपासून जैन समाजाचा 'स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठ' आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक इथल्या मुख्यत्वे सीमाभागातल्या 743 गावांतले भाविक या मठाशी जोडले गेले आहेत. या मठाच्या मुख्य स्वामींवर त्यांची श्रद्धा असते.

या मठाकडे 'महादेवी' हत्तीणीचं पालकत्व होतं आणि शेवटपर्यंत याचिकाकर्ते म्हणून मठानं सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई लढली. इथल्या अनेक धार्मिक परंपरांमध्ये हत्तीचा कायम सहभाग वर्षानुवर्षं राहिला आहे असं या मठाचं म्हणणं आहे.

माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, उच्चाधिकार समितीनं परवानगी देताना कोणत्या अटी घातल्या?

फोटो स्रोत, UGC

सर्वोच्च न्यायालयातील त्यांच्या याचिकेत मठातर्फे असं सांगण्यात आलं की, "जवळपास 1300 वर्षांपासून असलेल्या या मठात पूर्वीपासून हत्ती असण्याची परंपरा आहे. इथं कायम एक हत्ती असतोच आणि त्याची व्यवस्थित देखभालही केली जाते."

याच परंपरेनुसार 1992 साली इथं सध्या चर्चेत असलेल्या या हत्तीणीला आणलं गेलं आणि तिचं नाव 'महादेवी' असं ठेवलं गेलं. तिला इथं 'माधुरी'ही म्हटलं जायचं. मठ आणि गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ती गावकऱ्यांमध्ये मिसळून गेली होती.

इथल्या सगळ्या धार्मिक विधी आणि मिरवणुकांमध्ये 'महादेवी'ला मिरवलं जायचं. इथल्या पंचक्रोशीसाठी ती नांदणी गावची ओळख बनली होती.

मठानं शतकानुशतकं जिवंत ठेवलेल्या एका परंपरेची सध्याची प्रतिनिधी म्हणून तर तिला महत्त्वं होतचं, पण इतर वेळेसही तिला गावकरीच समजलं गेलं.

'महादेवी'शी जोडलेल्या याच भावना जेव्हा तिला निरोप देण्याची वेळ आली तेव्हा उफाळून आल्या होत्या.

तिच्या निरोप सभारंभची एक मिरवणूकच इथून निघाली. तिला गावातच थांबवण्यासाठी गेले काही वर्षं सुरू असलेल्या संघर्षामुळे त्या भावनांना अधिकच धार चढलेली होती. ती अनावर झाल्यामुळे या निरोपावेळेस स्थानिक पोलिसांना सौम्य लाठीमारही करावा लागला.

हे केवळ निरोपावेळेसच झालं असं नाही, तर त्याअगोदर काही दिवस 16 जुलैला जेव्हा उच्च न्यायालयाचाही मठाच्या याचिकेविरुद्ध निकाल आला, तेव्हाही झालं. या हत्तीणीला लगेचच गुजरातला नेत आहेत अशी बातमी पसरली आणि आजूबाजूच्या गावातले शेकडो लोक रस्त्यावर आले.

त्यांना 'महादेवी'ला घेऊन जाणारा रस्ता अडवायचा होता. या हत्तीणीशी जोडली गेलेली अशी ही प्रेमाची आणि त्यातून आलेल्या रागाची भावना होती.

वातावरण इतकं तापलं की राजकीय नेत्यांनाही यात पडावं लागलं, आणि काही नेत्यांनी मौन पत्करणंही पसंत केलं.

त्यांतर आता माधुरी पुन्हा नांदणीमध्ये परतली आहे. शुक्रवारी रात्री नागरिकांनी मोठ्या जल्लोषात तिचं स्वागत केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)